खासबागेतील विहिरी
अक्कलकोटमधील वटवृक्ष मठाकडून जंगमाच्या मठावरून पुढे चालत गेल्यास फत्तेसिंह चौक लागतो. समोरच वडार समाजाचे मारुती मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूस एक अत्यंत पडीक विहिर दिसते. तीच खासबबागेतली खास बावडी होय. इथूनच खासबागेचा परिसर सुरु होतो. पूर्वी हा भाग घनदाट वृक्षांनी आणि चिंचेच्या अनेक वृक्षांनी घेरलेला होता. असंख्य जंगली श्वापदे सर्रास फिरताना दिसत. अक्कलकोटच्या राजांची ही खास बाग. पन्नास – पंचावन्न एकरांची ही सुपीक जमीन. वर्षभर सतत हिरवीगार असायचो एवढ्या मोठ्या शेताला पाणी पुरवायचे म्हणूनच या शेतात सात आठ महाकाय विहिरी राजघराण्याने खोदल्या. यांचे भरभक्कम बांधकाम थक्क करणारे आहे. बागेतून पुढे गेल्यावर एकाला एक जोडलेल्या दोन विहिरी आहेत. मधे मोठी भिंत आहे. एकीतील उपसा सुरु झाला की दुसऱ्या विहिरीतील पाणी पहिल्या विहिरीत सरकते. अशी त्यांची रचना आहे. विहीरीच्या मध्यावर मोठी कमान आहे. हिलाच डबल बावडी म्हणतात. डबलबावडीच्या पुढे पंख्याची बावडी आणि तिच्या डाव्या बाजूला व्यंकट बावडी आहे. व्यंकट बावडीच्या पुढे असेलेली मगर बावडी. या सर्व विहिरींचा उल्लेख श्रीस्वामी चरित्रात येतो. या प्रत्येक विहिरींशी काहीना काही कथानक निगडित आहे. १८१० च्या दरम्यान श्रीमहाराजांनी एक छोटीशी मगर या विहिरीत सोडली होती. पुढे ती पंधरा फूट एवढी मोठी झाली. १८७४-७५ च्या दरम्यान या भागात कमालीची अतिवृष्टी झाली. त्यामुळे ही मगरबावडी दुथडी भरून वाहू लागली. जलप्रवाहाबरोबर मगर पाण्याबाहेर आली आणि तिथे धुमाकूळ घालायला सुरुवात केली. विहिरीबाहेर आलेल्या त्या मगरीने काही माणसांना घायाळ केले. दोन-तीन जनावरे मारली. म्हणून शेवटी तिलाही गोळी घालून ठार करण्यात आले. ही मगरबावडी अतिप्रचंड आहे आणि ती भरली म्हणजे त्याकाळी या दुष्काळी भागात त्यावेळी केवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असेल याची कल्पना येते. अर्थात यानंतर वर्षभरातच दुष्काळ पडला आणि लोकांचे हाल हाल झाले. त्याच दरम्यान शेख नूर दर्ग्याजवळील प्रचंड जलाशय तयार करण्यात आला. ते तळे हत्ती तलाव म्हणून प्रसिध्द आहे. वटवृक्ष स्वामी देवस्थानच्या मागे मारुती मंदिराजवळ असलेल्या विहिरीला नवीविहिर म्हणतात. मुरलीधर मंदिराजवळ उजव्या बाजूस शेखनूर दर्ग्याकडे जाताना दिसणारी भली थोरली विहिर. तिला साखर बावडी म्हणतात. वटवृक्ष देवस्थान परिसरात आर्पण फिरतो ती जागा म्हणजे विहिरीचाच वरचा भाग आहे. या विहिरींचे खारे पाणी महाराजांनीच मधुर बनवले व महाराजांच्या कृपेनेच या विहिरीला विपुल पाणी आहे. याला कुशावर्त तीर्थ म्हणतात. वर पत्रे घालून सध्या ही विहिर बंद केली आहे.
खास बागेत सुरवातीलाच एक मोठी विहीर होती. ही खासबावडी होय. ती आता ढासळली असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुढे खासबागेतील शेतात प्रथम डबलबावडी लागते. दोन प्रचंड मोठ्या विहीरी इथे सलग्न आहेत. मध्ये भिंत आहे. पुढे पंख्याच विहीर डाव्या बाजूला तर उजव्या बाजूस शेतात मध्यभागी गोल विहीर आहे. इथेच व्यंकट वावडी आहे. तिथून सरळ पुडे गेल्यावर महाकाय अशी मगर विहीर लागते. ह्या सर्व विहीरींवर श्रींचे वास्तव्य असायचे. त्याकाळी या विहिरींचा नियमीत उपसा होऊन त्या वापरात असल्यामुळे स्वच्छ होत्या. अक्कलकोट नरेशांची ही खास बाग श्रींनाही खूप प्रिय होती. वटवृक्ष मठाकडून फत्तेसिंह चौकातून पुढे गेल्यावर वडार समाजाचे मारुती मंदिराच्या डाव्या बाजूने सरळ गेल्यास, श्रीगिरीजा माता मराठी शाळेच्या अलीकडे काही घरे दिसतात. तिथूनच खास बाग सुरु होते. या विहीरींचे स्थापत्याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. पण तूर्तास विहीरींची साफसफाई व डागडुजी होणे गरजेचे आहे. या खास बागेतील सहा-सात विहीरी, गणेश बागेतील दोन विहीरी इथे श्री महाराजांचे वास्तव्य घडले आहे.
खास बागेत तर श्रीमहाराज सलग दोन दोन तीन तीन महिने मुक्कामास असल्याची वर्णने तिथे घडलेले प्रसंग जुन्या चरित्रांमधून आढळतात. अक्कलकोटचे राजे त्याकाळी या सर्व वापी-बावड्या तडागांचा गाळ काढून त्यांचे शुध्दीकरण करीत असत. पुढे संस्थाने खालसा झाली. घराघरातून पाण्याचे नळ बसले मग हे विहीरीचे पाणी उपसण्याचे कष्ट कोण करणार? ही खास बाग अनेक एकराच्या शेतात विस्तारली होती. वटवृक्षांचे आणि अन्य जंगली वृक्षांचे घनदाट साम्राज्य इते पसरलेले होते. विविध प्रकारच्या फळबागा, फुले, उस, ज्वारी सारखी मोसमी पिके यांनी मैलोन् मैल पसरलेला हा मळा सदैव माणसांच्या राबत्याने गजबजलेला असायचा. व्यंकट बावडीचे पाणी अक्कलकोट नरेश व प्रजानन पिण्यासाठी वापरीत असत. गणेशबावडी व आता शेवटच्या घटका मोजणारी बागेच्या प्रारंभी असलेली खास बावडी ही बुधवार पेठेची एके काळची जलदायीनी होती. पंख्याच्या विहीरीचा उपसा आज अखेर सुरु असल्यामुळे तिचे पाणी मात्र स्वच्छ आहे. एके काळी अवर्षणामुळे खास बावडीचे पाणी आटले. पिण्याच्या पाण्याची वानवा झाली. श्रीमहाराजांनी मूठभर हरबरे हाती घेऊन वेदातील जलमंत्र उच्चारीत विहीरीत फेकले आणि मंत्रसामर्थ्याची चुणूक दाखवत खासबावडीच्या तळाशी जलसंचय निर्माण केला. दत्तुशास्त्री त्यांना कायमचे सधन केले तो प्रसंग, हरिभाऊ तावडे तथा स्वामीसुतांचा अपमान या खासबागेतच घडला. माहुरच्या गोसाव्याचे गर्वहरण इथेच घडले.